कृषी सेवक | १७ नोव्हेंबर २०२२ | राजापूर (ता. सांगोला) येथे ग्रामस्थ आणि कृषी विभागाच्या सहकार्याने लोकसहभागातून गावातील ओढ्यावर वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. या वेळी तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, सरपंच मुक्ताबाई कदम यांच्यासह गावातील ग्रामस्थ, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. सरपंच मुक्ताबाई कदम, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण झांबरे, कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक व ग्रामस्थ यांच्यासह सेवा सोसायटी चेअरमन चंद्रकांत पाटील, पोलिस पाटील दुर्योधन गायकवाड, तात्यासाहेब पाटील, सुखदेव कदम, भाऊसाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, अमोल पाटील, आनंद कदम आदी उपस्थित होते.
वनराई बंधाऱ्यामुळे पावसाळा संपल्यानंतर ओढा, नाल्यामधून वाहून जाणारे पाणी अडवले जाते. यासाठी सिमेंटची रिकामे झालेले पोते घेऊन पोत्यामध्ये माती-वाळू भरून एकावर एक थरांमध्ये रचून ओढ्यामध्ये बांध घातला जातो. वनराई बंधाऱ्यामध्ये अडवलेल्या पाण्याचा उपयोग जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी, आजूबाजूच्या विहिरी व बोअरवेलमधील पाणी पातळी वाढण्यास होतो.
शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी कृषी विभागाच्या मदतीने जिथे-जिथे ओढा-नाल्यातून पाणी वाहून जाते, तिथे लोकसहभागातून वनराई बंधारे उभारण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.