कृषीसेवक | २७ ऑक्टोबर २०२३
अनेक शेतकरी शेतीच्या माध्यमातून मोठे उत्पन्न घेत असतात. या काळात अनेक शेतकरी सुधारित बियांन्याची देखील खरेदी करीत असतात. अधिकृत कंपनी समजून शेतकरी ठरलेली बियाण्यांची किंमत मोजूनही इगतपुरी-त्र्यंबकेश्वर भागात भात बियाणे कंपन्यांनी भेसळयुक्त बियाणे विकून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे, अशा आशयाचे निवेदन आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले.
काही बोगस बियाणे व कंपन्यांच्या कामकाजामुळे शेतकरी अडचणीत आहेत. बोरटेंभी येथील बाळू नवले यांच्या अडीच एकर क्षेत्रात भाताऐवजी कुसळे आल्याने एकरी वीस ते २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथे असेच प्रकार समोर आले आहेत. तालुका कृषी विभागात याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. आदिवासी मतदार संघात दर वर्षी प्रत्येक हंगामात भात बियाणे भेसळ निघण्याचे प्रमाण अधिक आहे. ज्या नियमात राहून साचेबंद धोरणाने बियाणे तयार करावे लागतात, ती प्रक्रिया काहीतरी कारणाने चुकून भेसळ बियाणे विक्रीला येतात. बियाणे विक्रीला येण्यापूर्वी बियाण्यांची कृषी विभागाने काळजी घेणे गरजेचे आहे.
आवश्यक चाचण्यांची पूर्तता करून नंतरच ते विक्रीला आणणे आवश्यक असते. मात्र, अधिक नफ्यासाठी खासगी व्यापारी, कंपन्या नियमांना तिलांजली देत भेसळ बियाणे विकत असल्याचे समोर आले असून, त्याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नामवंत कंपन्यांनी भेसळ बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.