कृषीसेवक | २ ऑक्टोबर २०२३
भारतातील प्रमुख व्यवसाय म्हणून शेती केली जाते. शेतकऱ्यांच्या मेहनतीवरच देशाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, शेती हा एक धोक्याचा व्यवसाय देखील आहे. शेतकऱ्यांना अनेकदा नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील चढ-उतार आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीतही काही शेतकरी आपल्या मेहनती आणि संशोधनातून भरघोस उत्पन्न घेत आहेत. बिहारमधील गया जिल्ह्यातील केसापी गावचा शेतकरी रामसेवक प्रसाद यांनी लिंबाच्या 10 झाडांपासून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
रामसेवक प्रसाद यांनी सुरुवातीला त्यांच्या शेतात लिंबाच्या 10 झाडांची लागवड केली. या झाडांपासून त्यांना वर्षभरात भरघोस उत्पन्न मिळत आहे. या 10 झाडापासून रामसेवक प्रसाद यांना वार्षिक तीन लाख रुपयांचा उत्पन्न मिळत आहे. रामसेवक प्रसाद यांच्या बागेतील झाडांना वर्षभर लिंबाची फळे येतात. रामसेवक हे कधीच झाडाचे लिंबू तोडत नाहीत, जेव्हा लिंबू झाडावरुन पडते, तेव्हाचे ते विक्रीसाठी बाजारात नेतात.
दिलेल्या माहितीनुसार, लिंबाच्या झाडाला लागवडीनंतर चार वर्षांनी फळे येऊ लागली. आता सध्या रामसेवक यांना एका लिंबाच्या झाडापासून वर्षभरात 25 ते 30 हजार रुपये मिळत आहेत. अशा प्रकारे 10 झाडांपासून लिंबू विकून रामसेवक यांना वर्षभरात तीन लाख रुपये मिळत आहेत. रामसेवक प्रसाद यांनी त्यांच्या शेतात लिंबाची आणखी 50 झाडे लावली आहेत. विशेष बाब म्हणजे रामसेवक प्रसाद हे त्यांच्या शेतात कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरत नाहीत. शेण खतांचा वापर करतात. त्यांची लिंबाची शेती ही झिरो बजेटची आहे.