कृषी सेवक । २८ एप्रिल २०२४ । दक्षिण कर्नाटकपासून ते संपूर्ण राज्यावर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती कायम आहे. ज्या कारणाने गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचे वातावरण पाहायला दिसून येत आहे. अशातच येत्या २४ तासांमध्ये दि. २८ एप्रिल २०२४ रोजी मराठवाड्या सोबतच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच, ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभाग आयएमडीने म्हटले आहे. या सोबतच विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते.
शेवग्यापासून सुरु करू शकता ‘हा’ प्रक्रिया उद्योग; बनतात ‘ही’ उत्पादने!
हवामान विभागाने राज्यात पावसासोबतच वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात राज्यातील अनेक भागांमध्ये प्रति तास ३०-४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. आज प्रामुख्याने कोकण किनारपट्टी भागात उष्ण व आर्द्र हवामान राहणार असून, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. तर सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट असणार आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
Weather Update । महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता!
राज्यात सध्या दिवसासह रात्रीच्या उकाडयात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा ५ अंशांनी वाढल्याने, येत्या काही दिवसांत रात्रीच्या उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर सध्या पडत असलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे. तर अवकाळी पाऊस व गारपिटीचे असलेले महाराष्ट्रातील वातावरण ३० एप्रिलपासून निवळण्याची शक्यता आहे, असेही भारतीय हवामानशास्र विभाग आयएमडीकडून सांगितले जात आहे.