कृषी सेवक । ५ फेब्रुवारी २०२३। देशासह राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत असून काही भागात पावसाची शक्यता दिसत आहे तर काही भागात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. याचा फटका मात्र शेती पिकांना बसत असल्याचं चित्र दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातही हरभरा पिकावर या हवामान बदलाचा मोठा परिणाम झाला आहे. हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कारण हरभरा पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यात 80 हजार हेक्टर शेतीत हरभरा पिकाचा पेरा करण्यात आला आहे. यावर्षी हरभरा पीक जोमाने आलं होतं. मात्र, हवामान बदलामुळं हरभरा पिकावर मर या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं पीके आता लाल आणि पिवळी पडत आहेत. अशा परिस्थितीत पिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वातावरणातील बदल आणि बीज प्रकियेचा अभाव यामुळे सध्या हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा बुरशीजन्य रोग असून ‘फ्युजेरियम ऑक्सिस्फोरम’ या बुरशीमुळं होतो. या रोगाची लक्षणे साधारणपणे पेरणीनंतर तीन ते चार आठवड्यांनी दिसून येतात. पीक वाचवण्यासाठी मर रोगाची लक्षणे ओळखून वेळीच नियंत्रण करण गरजेच असते.
मर या रोगाची लक्षणे आणि उपाय नेमकी काय आहेत…?
मर रोगाची बुरशी बियाणातून अथवा जमिनीतून मुळाद्वारे रोपात प्रवेश करते. कोवळी पाने आणि फांद्या सुकतात. शेवटी पूर्ण झाड वाळून जाते. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने जमीन आणि बियाद्वारे होतो. प्रथम पाने पिवळसर होतात आणि सुकतात. मर रोगग्रस्त झाड शेवटी पूर्णपणे सुकून जात. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास झाडांची संख्या कमी होऊ पीक विरळ होते. परिणामी उत्पादनात घट होते.
मर रोग पडल्यास नेमके उपाय काय करावेत…?
एकाच शेतात सतत हरभरा पीक घेणे टाळावे मर रोगग्रस्त जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये लागवडीपूर्वी जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. मर रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून शेताबाहेर उपटून फेकून द्यावीत. मर रोगाचा प्रादुर्भाव शेतात दिसताच जैविक बुरशीनाशक शेणखतातून मातीत टाकावे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम