कृषी सेवक I २४ डिसेंबर २०२२ I येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांत यंदाच्या रब्बी हंगामात (Rabi Season) आजवर १५ लाख १२ हजार ५९९ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. पाचही जिल्ह्यांतील रब्बीचे सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर आहे.
लातूर कृषी विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली नांदेड या पाच जिल्ह्यांत खरिपाची २७ लाख ६२ हजार ४८९ हेक्टरवर पेरणी झाली होती. पेरणी झालेल्या या क्षेत्रापैकी मोठ्या प्रमाणातील अति व सततच्या तसेच अतिवृष्टीमुळे हातची गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त ही रब्बी हंगामावर अवलंबून आहे. खरिपातील ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांची काढणी पूर्ण झाली असून, तूर आणि कपाशीचे पीक अजून बाकी आहे.
परभणी जिल्ह्यात कपाशीवर काही ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. यंदा पाचही जिल्ह्यांत रब्बीचे सरासरीक्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर असताना प्रत्यक्षात सरासरीच्या १११ टक्के म्हणजे १५ लाख १२ हजार ५९९ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.
सरासरीच्या पुढे जाऊन नांदेड जिल्ह्यात रब्बीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. त्या पाठोपाठ सरासरीच्या पुढे जाऊन पेरणी झालेल्या लातूर, परभणी जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत मात्र सरासरी क्षेत्र इतकीही पेरणी झाली नसल्याची स्थिती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात हरभरा पिकावर काही प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
जिल्हानिहाय रब्बीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
जिल्हा सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी
लातूर २८०३४७ ३५९७१५ १२८
उस्मानाबाद ४१११७२ ३९८०५६ ९७
नांदेड २२४६३४ ३२३६०९ १४४
परभणी २७०७९५ २७७५५८ १०२
हिंगोली १७६८९३ १५३६६१ ८७
पीकनिहाय सरासरी व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारी
रब्बी ज्वारी ३७१८५७ २६५०२७ ७१
गहू १५६५१९ १३२५२६ ८५
हरभरा ७८६१२४ १०६७६९० १३६
रब्बी मका १७९७१ १३९६१ ७८
करडई १९५३१ २३३७२ १२०
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम