कृषीसेवक | १९ ऑक्टोबर २०२३
राज्यातील अनेक शेतकरी पावसामुळे हतबल झाले आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने हंगाम २०२४-२५ साठी रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. यात राज्याचं महत्वाचं रब्बी पीक असलेल्या हरभऱ्याच्या हमीभावात १०५ रुपयांची वाढ केली. म्हणजेच यंदाच्या रब्बीत हरभऱ्याला ५ हजार ४४० रुपये हमीभाव असेल. तर गव्हाचा हमीभाव १५० रुपयांनी वाढवण्यात आला. मसूरच्या हमीभावात सर्वाधिक ४२५ रुपये वाढ करण्यात आली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी दि.१८ हंगाम २०२४-२५ च्या रब्बी पिकांच्या हमीभाव वाढीला मान्यता दिला. रब्बी हंगामात हरभरा हे राज्याचे मुख्य पीक आहे. देशात कडधान्याचा पुरवठा कमी असल्याने मागील काही आठवड्यांपासून हरभऱ्याचा भाव वाढला. तसेच देशातील दुष्काळी स्थिती आणि कडधान्याचा तुटवडा लक्षात घेऊन सरकारने कडधान्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात केंद्र सरकार हरभऱ्याच्या हमीभावात किती वाढ करते, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण सरकारने हमीभावात केवळ १०५ रुपयांची वाढ केली. म्हणजेच यंदा हरभऱ्याचा हमीभाव ५ हजार ४४० रुपयांवर पोचला. मागील हंगामात हरभऱ्याला ५ हजार ३३५ रुपये हमीभाव होता.
सरकारने गव्हाच्या हमीभातही १५० रुपयांची वाढ केली. गव्हाचा हमीभाव २ हजार २७५ रुपयांवर पोचला. मागील हंगामात गव्हाचा हमीभाव २ हजार १२५ रुपये होता. मोहरीच्या हमीभावात २०० रुपयांची वाढ करून ५ हजार ६५० रुपये करण्यात आला. सूर्यफुलाच्या हमीभावात मात्र केवळ १५० रुपयांची वाढ करण्यात आली. यंदा सूर्यफुलाला ५ हजार ८०० रुपयांचा आधार मिळेल.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम