कृषिपंपांना वीज जोडणी मिळत नसल्याने शेतकरी हैराण

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २१ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक शेतकरी वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नेहमीच संकटात येत असतांना आता खानदेशात कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी अनेक शेतकऱ्यांची वणवण सुरू आहे. यातच वीज वितरण कंपनीतर्फे दुष्काळी भागातील अतिपाणी उपसा अशी कारणे सांगून शेतकऱ्यांना नवी वीज जोडणी कृषिपंपांना दिले जात नसल्याची माहिती आहे.

जळगाव, धुळे जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार नवी वीज जोडणीचे प्रस्ताव गेले सात ते आठ महिने रखडले आहेत. मार्चपासून हे प्रस्ताव मार्गी लावण्याचे कामच रखडले आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे वर्षभरापूर्वी ज्या विहिरी अनुदान तत्त्वावर मागासवर्गीय, अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना देण्यात आल्या, त्या शेतकऱ्यांनादेखील वीज जोडणी मिळत नसल्याची स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात या विहिरींचे सुमारे १० प्रस्ताव रखडल्याचे सांगण्यात आले.

इतर शेतकरीदेखील आपली शेती सिंचनाखाली आणण्यासाठी विहिरी, कूपनलिका तयार करतात. परंतु नवे रोहित्र घ्यावे लागेल, संबंधित भागातील रोहित्रावर नवी जोडणी देता येणार नाही, तशी परवानगी नाही, नव्या रोहित्रासाठी एक लाख रुपये खर्च येईल, अशी बतावणी वीज वितरण कंपनीमधील मंडळी करते. यामुळे शेतकऱ्यांची अडचण अधिकची वाढत असून, ही समस्या कोणाकडे सांगावी व मार्ग कसा काढावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

या समस्येची दखल घ्यायला अधिकारी तयार नाहीत. वीज कंपनीच्या कार्यालयात अनेक कर्मचारी प्रतिसाद देत नाहीत. अधिकारी भेटण्यास नकार देतात. यामुळे या खरिपातही पूर्वहंगामी (बागायती) कापूस पीक शेतकरी केवळ कूपनलिका किंवा विहिरीला वीज संयोजन नसल्याने घेवू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम