यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपले; अनेकांचे संसार उघड्यावर!

१५ हेक्टर पिकाला अवकाळीचा मोठा फटका
बातमी शेअर करा

कृषी सेवक । ३० एप्रिल २०२४ । महाराष्ट्रात उन्हाचा कडाका जास्तच वाढलेला आपल्याला दिसून येत आहे. तसेच, अलीकडे मराठवाड्यासोबतच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रविवारी दि २८ एप्रिल रोजी विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्ध्यासह चंद्रपूर जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अनेक झाडे उन्मळून पडली असल्याचे दृश्य समोर आले आहे.

दुग्धव्यवसायाला मिळेल गती; ‘या’ यंत्राद्वारे होईल दूध काढणीचे काम सोपे..!

तसेच, काहींच्या घरांवरील पत्रे देखील उडून गेली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगांव तालुक्यात रविवारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासोबतच तुफान पाऊस झाला. सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. तसेच ७ घरांची पडझड देखील झाली. झाडे उन्मळून पडल्याने अनेक गावातील वीज बंद होती. पिंपळगाव येथील १५ हेक्टर तीळ आणि आलेगाव येथे दोन हेक्टर केळी पिकाला अवकाळीचा मोठा फटका बसला.

अकोला, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासोबतच जोरदार पाऊस झाला असून काही ठिकाणी गारपीटीचा तडाखा देखील बसला आहे. वर्ध्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यात बोराच्या आकाराची गारपीट झाली. यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच दि. २९ एप्रिल रोजी विदर्भातील ११ जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

शेवग्यापासून सुरु करू शकता ‘हा’ प्रक्रिया उद्योग; बनतात ‘ही’ उत्पादने!

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील येरड परिसराला देखील सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास पावसासह चक्रीवादळाचा तडाखा बसला. अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे येरड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या झिबला येथील दोन घरावरील टीनपत्रे उडून गेली. खरबी मांडवगड येथील एका घरावरील टीनपत्रे उडाली. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संसार उघड्यावर पडल्याने सरकारने पंचनामे करून तात्काळ मदत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment