थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे ; शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २२ डिसेंबर २०२२ I जळगाव जिल्ह्यातील केळी हे प्रमुख फळपिक असून सद्यस्थितीत तापमान कमी – कमी होत असून त्याचे केळी पिकावर विपरीत परिणाम होत आहे. केळीच्या चांगल्या वाढीसाठी तापमान 16 ते 30 सें.ग्रे. यादरम्यान असावे. कमी तापमानाचा कंद उगवण, मुळयांची वाढ, मुळयांची कार्यक्षमता, पाने येण्याचा वेग, पानावर चट्टे येणे, झाडांची वाढ मंदावणे, फळांची वाढ मंदावणे, फळपक्वतेस येण्याचा कालावधी वाढणे, केळी पिकण्याची क्रिया मंदावणे, इत्यादी दृष्ट व अदृष्य परिणाम होतात. सद्यस्थितीत मागील वर्षी ऑक्टोबर मध्ये लागवड केलेली कांदेबाग काढणीच्या अवस्थेत, या वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात लागवड केलेली बाग फळवाढीच्या अवस्थेत व या वर्षी जून महिन्यात लागवड केलेली बाग शाखीय वाढीची अवस्था संपवून निसवण्याच्या अवस्थेत आहेत. केळीच्या या सर्व अवस्था कमी तापमानास अत्यंत संवेदनशील असून केळीच्या चांगल्या वाढीसाठी तसेच उत्पादन व गुणवत्तेसाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे, या विषयी माहिती देण्यात येत आहे.

नवीन लागवडीच्या बागेत कुळवाच्या पाळया देवून बागेतील माती भुसभुशीत ठेवावी, बागा तणमुक्त ठेवाव्यात व मुख्य झाडाशेजारीत पिल्ले नियमित कापावीत, बागेतील मुख्य झाडाचे कोणतेही पान कापू नये, फक्त रोगग्रस्त पानांचा भाग काढावा व बागेबाहेर नेवून नष्ट करावा, झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रति झाड 250 ते 750 ग्रॅम निंबोळी ढेप द्यावी, शक्य असल्यास बागेत सेंद्रिय आच्छादन करावे, रासायनिक खताच्या मात्रा वेळापत्रकानुसार द्याव्यात, थंडीच्या दिवसात केळीस रात्रीच्या वेळेस पाणी पुरवठा करावा, सकाळी भल्या पहाटे ओलसर काडी कचरा पेटवून बागेच्या चारही बाजूस धुर करावा, बागेभोवती संजीव कुंपण असावे, नसल्यास पळकाडयाच्या झापा करुन किंवा 50 टक्के शेडनेट वापरुन वारा रोधक कुंपण करावे, घड व्यवस्थापनात केळी फुल कापावेत, घडावर इच्छित फण्या ठेवून बाकीच्या फण्यांची विरळणी करावी. घडावर फुलकिडींच्या नियंत्रणासाठी व घडातील केळी फळांच्या वाढीसाठी अनुक्रमे व्हर्टीसिलियम लेकॅनी (3 ग्रॅम/ लिटर ) व 0.5 टक्के पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट + 1 टक्के युरियाची फवारणी करावी. घडावर कोरडया केळी पानांचे किंवा 100 गेज जाडीच्या, 2-6 टक्के सच्छिद्रतेच्या पॉलीप्रापिलिनच्या स्कर्टिग बॅगांचे आवरण करावे,

काढणी झालेल्या सर्व झाडांवरील पाने कापावीत, यामुळे त्यांची वाढ होत नाही व जमिनीतून अन्नद्रव्ये घेतली जात नाहीत. बागेत काही वेळी सुक्ष्म अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे दिसून येतात अशा वेळेस सुक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीतुन किंवा ठिबकव्दारे द्यावीत, बागेतील विषाणूजन्य रोगट झाडे समुळ नष्ट करावीत, रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून शिफारशीत आंतरप्रवाही किडीनाशकांची फवारणी घ्यावी, बागेत करपा किंवा सिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कार्बेन्डेझिम 10 ग्रॅम किंवा प्रोपिकोन्याझॉल 10 ग्रॅम किंवा ट्रॉयडेमार्क 10 ग्रॅम या बुरशीनाशकाची 10 लीटर पाण्यात स्टिकरसह मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. पहिल्या फवारणह नंतर 7 ते 21 दिवसांच्या अंतराने रोगाच्या तीव्रतेनुसार 3 ते 4 फवारण्या घ्याव्यात. तसेच सुरवातीच्या फवारण्या नंतर रोगाच्या तीव्रतेनुसार प्रति 10 लीटर पाण्यात प्रोपिकोन्याझॉल 5 मि.ली. किंवा कार्बेन्डेझिम 5 ग्रॅम + 100 मि.ली. मिनरल ऑइलच्या 2 ते 3 फवारण्या दर 2 ते 3 आठवडयाच्या अंतराने कराव्यात.

विद्राव्य खत 19:19:19 हे 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे घेऊन त्याची केळीवर फवारणी करावी. अशा पध्दतीने व्यवस्थापन केल्यास कमी तापमानाचा होणारा परिणाम कमी होतो व नुकसानीची तिव्रता कमी होते. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम