हवामान खात्याचा अंदाज ; या जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २० फेब्रुवारी २०२३।  राज्यातील हिवाळ्यातील थंडी आता कमी झाली आहे. तर काही ठिकाणी गेल्या आठवड्यापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

तर, कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईमध्ये देखील सातत्याने तापमानात वाढ होताना दिसत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये पुढील चार ते पाच दिवस आकाश निरभ्र असल्यामुळे सूर्याची किरणे अधिक तापदायक ठरू शकतात.

रविवारी मुंबईतील कुलाबा येथे 34.2 अंश सेल्सिअस कमान तापमान नोंदवण्यात आले आहे. तर रत्नागिरीमध्ये तापमानाचा पारा 35.1 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. या भागांमध्ये नोंदवण्यात आलेले तापमान सरासरीच्या तुलनेपेक्षा 5.6 अंश सेल्सिअसने अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी उन्हाचा तडाका जाणवायला सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तापमानाचा पारा ते 30 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये किमान आणि कमाल तापमानात मोठी तफावत दिसून आली आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आले आहे. सोलापूरमध्ये 36.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे.

दरम्यान आज (20 फेब्रुवारी) रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा त्रास अधिक होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कच्छमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या लाटेचा परिणाम राज्यातही दिसू शकतो. राज्यासह गोव्यामध्ये देखील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. गोव्यामध्ये तापमानाचा पारा 37 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असल्याचा अंदाज आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम